धाराशिव : (Dharashiv Pikvima) खरीप 2024 मधील 75 हजार 677 शेतकऱ्यांची थकीत 48 कोटी 77 लाख रुपयांची पिक विमा नुकसानभरपाई न मिळाल्याने 29 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन जाहीर केले होते. मात्र त्याच दिवशी मुंबई येथे मराठा आरक्षणासाठी श्री मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन असल्यामुळे हे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले असल्याची माहिती शेतकरी नेते अनिल जगताप यांनी दिली.
धाराशिव जिल्ह्यात खरीप 2024 मध्ये एकूण 7 लाख 19 हजार शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता. अतिवृष्टीमुळे 5 लाख 19 हजार शेतकऱ्यांना एचडीएफसी कंपनीमार्फत 218 कोटी रुपये वितरित झाले. परंतु काढणीपश्चात (Post Harvesting) नुकसानभरपाई म्हणून 75 हजार शेतकऱ्यांचे जवळपास 49 कोटी रुपये थकीत होते.

राज्य शासनाचा हिस्सा न मिळाल्याने विमा कंपनीकडून ही रक्कम अडवली गेली होती. याविरोधात श्री. जगताप यांनी 28 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना पैसे न दिल्यास आंदोलन करू असा इशारा दिला होता. त्यानंतर तातडीने हालचाली सुरू होऊन विमा कंपनीने पोर्टलवरील सर्व आकडेवारी अपडेट केली आहे. त्यामुळे दोन-चार दिवसांतच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याची शक्यता आहे.

“जर तसे झाले नाही तर मराठा आंदोलनानंतर शेतकऱ्यांच्या थकबाकीसाठी धरणे आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा अनिल जगताप यांनी दिला.