(धाराशिव) : Dharashiv Pikvima : खरीप 2024 मध्ये धाराशिव जिल्ह्यातील सात लाख 19 हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता गेल्या वर्षी अतिवृष्टी झाल्यानंतर कंपनीने पाच लाख 19 हजार शेतकऱ्यांना 218 कोटी रुपयांचे वाटप केले होते मात्र काढणी पश्चात कव्हर अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील 75 हजार 677 शेतकऱ्यांना जवळपास 49 कोटी रुपयांचे वाटप होणे बाकी होते.

कंपनीच्या म्हणण्यानुसार राज्य शासनाकडून त्यांच्या हिश्याची रक्कम न आल्याने त्यांनी पीक नुकसान भरपाई चे 49 कोटी रुपयांचे वाटप थांबवले होते. मात्र राज्य शासनाने अलीकडील काळात पिक विमा कंपनीच्या हिश्याची रक्कम दिली असल्याचे सांगितले होते. तसेच केंद्रीय कृषिमंत्री यांनी राजस्थान येथे 11 ऑगस्ट रोजी कार्यक्रम करून देशातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या इशाची पीक नुकसान भरपाई मिळेल असे सूचित केले होते मात्र कंपनीकडून पीक नुकसान भरपाई मिळत नव्हती. विशेष म्हणजे गेल्या वर्षी शेतकरी राज्य व केंद्र शासनाचा हिस्सा मिळून पिक विमा कंपनीला 596 कोटी रुपये रक्कम दिली गेली आहे. आणि कंपनीकडून सर्वच वाटप होणारी पीक नुकसान भरपाई ची एकत्रित रक्कम केवळ 272 कोटी इतकी होत आहे त्यातही काढणी पश्चात कव्हर अंतर्गत चे पैसे देण्यास कंपनी विलंब करत होती.

या विरुद्ध शेतकरी नेते अनिल दादा जगताप यांनी 28 ऑगस्ट पर्यंत पीक नुकसान भरपाईची रक्कम नाही दिल्यास 29 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचे लेखी पत्र जिल्हाधिकारी यांना दिले होते. मात्र मराठा आरक्षण आंदोलनामुळे त्यांनी ते आंदोलन स्थगित केले होते. मात्र त्यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याने कृषी विभाग आणि कंपनी यांच्यात पत्रव्यवहार व थेट फोन द्वारे चर्चा होऊन अखेर पीक विमा कंपनीने 2 सप्टेंबर पर्यंत 75 हजार 677 शेतकऱ्याची जवळपास 49 कोटी रुपयांची रक्कम वाटप करणार असल्याचे लेखी पत्र जिल्हा कृषी विभागाला दिले असून जिल्हा कृषी अधिकारी यांनी शेतकरी नेते अनिल जगताप यांना तसे लेखी पत्राद्वारे कळवले आहे.
शेतकऱ्याचा पिक विमा अतिवृष्टी नुकसान भरपाई यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या शेतकरी नेते अनिल जगताप यांचे शेतकऱ्यातून कौतुक होत असून समाधान व्यक्त केले जात आहे.